मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत येणाऱ्या दिवसात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात पाऊले उचलण्याचे संकेत दिले होते.
त्यात आता समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाची संख्या मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. तसेच लॉकडाऊन लावायचा की नाही या संदर्भात चर्चा केली.
त्यात आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उपद्रव झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता.