मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसलुईचा भांडाफोड केला होता. या आरोपानंतर काल मध्यरात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मुद्द्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चौकशी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
अजित पवार म्हणाले, ‘हे आरोप गंभीर आहेत यात शंका नाही. त्याबद्दल अनिल देशमुखांना जे काही सांगायचे होतं ते त्यांनी सांगितलं आहे. माझ्यासह बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे अशा सर्वच सहकाऱ्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे. आता त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय काय घेतात हे कळेलच. ते मला विचारून निर्णय घेणार नाहीत. मात्र, त्यांचा जो काही निर्णय असेल, त्यामागे आम्ही सगळे राहू. असे अजित पवार यांनी बोलून दाखविले होते.
तसेच विरोधकांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर बोलताना पवार म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे. पोलीस खात्यातील काही लोकांनी गंभीर चुका केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल. अधिवेशनाच्या कालावधीबाबत म्हणाल तर केंद्र सरकारनंही करोनामुळं अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. अन्य राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. सरकारच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही. सरकारला पूर्ण बहुमत आहे. सगळे आमदार सरकारच्या पाठीशी आहेत असे विधान त्यांनी केले होते.