राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एका उद्योगपतीने सांगितलं आहे की लॉकडाउन लावण्याऐवजी सुविधा वाढवा. आरोग्यसुविधा आपण देतच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधेत वाढ करत आलो आहोत. अजूनही ती वाढवत आहोत. पण मुद्दा असा येतो की हे जे काय आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो की, उद्योगपतीना (सगळ्या उद्योगपतींना नाही, तर ज्यांनी करोनाबाबत सल्ला दिला आहे त्यांना) सांगतो की ते म्हणाले आरोग्य सुविधा वाढवा… तर आम्ही वाढवतो, बेड्स वाढवतो, सगळं वाढवतो. पण कृपा करून मला रोज किमान ५० डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा.’ असा टोला त्यांनी लगावला होता,