राज्यात पुन्हा एकदा झपाट्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यातच वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात १५ दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी वर्तवली आहे. त्यातच आता मालेगावात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. ते मालेगावात कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते.
कोरोनाच्या महामारीत आपण चांगली माणसे गमावली असून ही महामारी रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर भुमीका, कारवाई व अंमलबजावणी केल्याशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील संशयित व बाधित रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणास विरोध केल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
तालुक्यात सुरवातील कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या ३८ गावांची संख्या कमी होवून आज १९ वर आल्याचे सांगतांना मंत्री भुसे म्हणाले, या १९ गावातील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.