मुंबई : मागच्या वर्षभरात राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी विविध गोष्टीसाठी केंद्राकडे मदत मागत आहे, या सर्व संकटात राज्यात निर्माण झालेली परिस्थिती ऑक्सिजनचा तुटवडा, आर्थिक संकट या सगळ्या पार्श्वभूमीवर १ मे या महाराष्ट्र दिनी शिवसेनेने केंद्रातील भारतीय जनता पक्षाचा परखड शब्दांमध्ये संचार घेतला आहे.
“महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत. राज्यातलं लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबलं आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे” अशा शब्दात केंद्रातील मोदी सरकारचा समाचार घेण्यात आलेला आहे.
“दिल्लीतील सरकारे बदलत राहिली, तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राचे हक्काचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबाडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. राज्यातल्या अनेक योजना आणि प्रकल्प गुजरातला नेऊन ठेवले मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि राज्याची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू होता”, अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे. गुजरात राज्यात करोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे विदारक दृष्य आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले असं म्हणत गुजरातमधील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आहे.