मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधी पक्ष (भाजपा) आणि केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे.
आज ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं करोना लढाईत अपयशी ठरली असल्याचे सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचे सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
‘जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं करोना संसर्गाशी लढण्यात अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचे म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचे हे अपयश आहे. ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे असे संजय राऊत यांनी म्हटले.
‘करोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला.कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असे तंत्र या लोकांनी निर्माण केले आहे का?,’ असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.