मुंबई : सध्या राज्यात कोरोना रुग्णालयांत आगीच्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात नाशिकचे प्रकरण ताजे असताना आता विरार येथील कोविड रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर येत आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.
या घडलेल्या घटनेमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.
तसेच आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.