शाळांचे खाजगीकरण व नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणाऱ्या शिंदे – फडणवीस – पवार सरकारच्या धोरणाविरोधात वडवणीत विद्यार्थी – युवकांसह नागरिकांचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा.

वडवणी :- ( प्रतिनिधी)आज दि. २० रोजी वडवणी शहरात खाजगीकरण – कंत्राटीकरण विरोधी जनआंदोलन, वडवणीच्या वतीने शाळांचे खाजगीकरण व नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारच्या शासनाध्यादेश अर्थात धोरणाविरोधात वडवणी शहरात विद्यार्थी – युवकांसह नागरिकांचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – वडवणी पोलीस स्टेशन – छ.शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय या मार्गे प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. खाजगीकरण – कंत्राटीकरण्याच्या विरोधात आज वडवणी तहसिलवर २००० विद्यार्थी – युवकांसह नागरिक उतरले. यावेळी विद्यार्थी,युवक, शेतकरी, शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक, पालक, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाजगीकरण – कंत्राटीकरण विरोधी जनआंदोलनाची स्थापन झाल्यापासून वडवणी तालुक्या मध्ये गावा – गावात, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आली होती तसेच दि.१८ रोजी शासन आदेशाची होळी करण्यात आली होती. आज झालेल्या मोर्च्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वडवणी तहसीलदार यांच्यामार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात
१) शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, अनेक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपकरण व इतर आस्थापनातील १३८ प्रकारच्या कर्मचाऱ्यांची भरती बाह्य यंत्रणे कडून कंत्राट दाराकडून कंत्राटीपद्धतीने भरती करणाऱ्या कर्मचारी शिक्षक नियुक्तीचा ६ सप्टेंबर २०२३ चा शासन आदेश रद्द करावा.
२) शासकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच ३५३ पूर्ववत करा
३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमांच्या ६२ हजार शाळा दत्तक देण्याचा दिनांक २८ सप्टेंबर २०२३ च्या शासनादेश रद्द करा.
४) सर्व विद्यार्थ्यांचे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सरसकट शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क करा. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करावी.
५) १५००० शाळा बंद करून मोजक्या समूह शाळा सुरू करून ग्रामीण शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारे दिनांक २१ सप्टेंबर २०२३ चे परिपत्रक रद्द करावे.
६) बीड जिल्ह्यातील सर्व पिकांना शंभर टक्के पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्या.
७) सरकारी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे खाजगीकरण करणारा ४ ऑक्टोंबर २०२३ चा शासनादेश रद्द करा
८) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालास उत्पादक खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव देण्यात याव.
९) सर्व सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरी देण्यात याव्या आणि नोकरी मिळेपर्यंत बेकार भत्ता देण्यात यावा.
१०) मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
११) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी.
१२) पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट ५०००० रुपये हेक्टरी मदत जाहीर करून तात्काळ देण्यात यावी.
१३) शेतकऱ्यांना पिकांना हमीभाव देणारी शासकीय केंद्रे चालू करावीत.
१४) विनाअनुदान धोरण रद्द करून सर्व शिक्षण संस्थांना १०० % अनुदान द्या.
१५) केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह सर्व परीक्षा निशुल्क करण्यात याव्यात
१६) ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा.
१७) अंगणवाडी आशा वर्कर्स आणि शालेय पोषण आहार, कोविड कर्मचारी यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
१८) सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत तात्काळ भरण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात वडवणी शहरातील विविध शाळा,महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी – युवक सहभागी झाले होते. त्याचबरोबर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक ,प्राध्यापक, शेतकरी, कामगार वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या मोर्चा दरम्यान आंदोलक विद्यार्थी – विद्यार्थिनींनी, युवक शिंदे – फडणवीस सरकारच्या शाळांचे खाजगीकरण व नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणाऱ्या जनविरोधी धोरणाविरोधात दिलेल्या गगनभेदी घोषणांनी वडवणी शहर दणाणून गेले. या गगनभेदी घोषणांमुळे शहरातील व्यापारी – व्यवसायिक नागरिकांचे देखील या जनविरोधी धोरणाकडे लक्ष वेधले गेले. हा मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहचल्या नंतर या मोर्चाचे रूपांतर जनसभेत झाले.
त्यानंतर या जनसभेस खाजगीकरण – कंत्राटीकरन विरोधी जनआंदोलनच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधातील भूमिका विशद करण्यात आली. त्यानंतर वडवणी तहसील चे तहसीलदार श्री. मांडे यांच्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शाळांचे खाजगीकरण – नोकऱ्यांचे कंत्राटीकरण तात्काळ रद्द करा व इतर मूलभूत नागरी समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले. या प्रचंड मोर्चा – आंदोलनाचा यशस्वी समारोप करण्यात आला. या मोर्चा च्या यशस्वीतेसाठी किरण ढोले, लहू खारगे, तेजस शिंदे, सत्यजित मस्के, श्रीनिवास काकडे, अशोक फपाळ, जगदीश फरताडे, ओम पुरी, अभिषेक हातागले, करण भिसे, करण साळवे, सिद्धेश्वर पाटोळे, रशीद पठाण, गोपीचंद टेटांबे, ज्ञानेश्वर झाडे, ज्योतीराम कलेढोन, ज्ञानेश्वर राऊत, सुदाम खाटोकर,गणेश म्हेत्रे,प्रकाश खाटोकार, पंकज कळसकर, डॉ.रामहरी मायकर व इतर सर्व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.