दिवसेंदिवस राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारवर एकामागोमाग एक गंभीर आरोप करत असल्याचे दिसत आहेत व राज्य सरकारकडून या प्रश्नांची उत्तरं ही दिली जात आहेत. परमबीर सिंग, सचिन वझे व अनिल देशमुख या सर्व विषयांवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडनवीसांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत असं म्हटलं. “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका त्यांनी केली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. असंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.