आनंदी असू देत आपली दिनचर्या !
के.डी. सर

‘भावना’, शब्दांमागचे रहस्य…हृदयातून उमलणारी भावना हिला आकार, गंध नसला तरी विश्वातील ती सर्वात सुंदर गोष्ट आहेच,पण ही ईश्वराने मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. ‘भावना’ या शब्दाचे सामर्थ्य सांगायला शब्द अपुरे पडतील. भावना हा एक गोड अनुभव आहे, अतूट विश्वासाची संकल्पना आहे, नात्यांना जोडणारे माध्यम आहे, आयुष्याला जपणारा आधार आहे, सुखाची वाटणी करणारी कला आहे, दुःखाची तीव्रता कमी करण्याची शक्ती आहे, आनंद उपभोगण्याचे साधन आहे, आवडते स्वीकारुन नाते जोडण्याचा गुण आहे, नावडते संबंध नाकारुन दूर करण्याची ताकत आहे.
हीच भावना जी बहुतांशी लोकांना असते; काहींना त्याचा अर्थ कळतो, काहींना कळत नाही, काही भावनेच्या आधारावर जगतात, काही आधारसाठी भावनेचे सहाय्य घेतात, आणि काही भावनेचा वापर करून आपला “व्यवसाय” अगदी सहजतेने करीत असतात. फारच थोडे असतात जे भावनेचा अर्थ समजून आयुष्यभर त्याची सोबत करतात, मात्र भावनेच्या ओघात कोणता निर्णय त्वरित घेऊ नये, भावनेच्या ओघात कधी रागावू नये, कुणाशी मैत्री करु नये, कुणाला दूर करु नये, कारण नात्यांमधील गैरसमज व अविश्वास यातूनच निर्माण होत असतात.
✍️के डी सर ग्रंथपाल बलसूर-धाराशिव