मुंबई : राज्यात पुरवण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापू लागले होते. तसेच विरोधकांनी सुद्धा याच मुद्द्यावरून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आकडेवारीनुसार केंद्राने केलेल्या दुजाभाव समोर आणला आहे.
केंद्र सरकारने राज्याला एका आठवड्यासाठी साडे सात लाख लसींचा पुरवठा केला आहे. तर, इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र राज्याला कमी लसीचा पुरवठा केला आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच या संदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचा दाखल सुद्धा दिला आहे.
टोपे म्हणाले की, राज्याला एका आठवड्यासाठी केंद्र सरकारने फक्त साडे सात लाख लसीचे डोस दिले आहेत. मात्र उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. ही आकडेवारीचा तक्ता आल्यानंतर मी तातडीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ही दुरुस्ती होण्याची वाट पाहात आहोत,’ असं टोपे यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये ६ कोटी लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत १ कोटी डोस दिले, आपल्याला १ कोटी ४ लाख डोस दिले. गुजरातमध्ये १७ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आपल्याकडे ४.५ लाख आहेत. मृतांचा आकडा देखील आपल्याकडे खूप जास्त आहे. जिथे जास्त गरज आहे, तिथे अधिक लक्ष द्यावे ही विनंती आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.