रायगड- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आणि त्यामुळे शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येऊ लागलं आहे. रायगडमध्ये सुद्धा बुधवारी म्हणजेच २ फेब्रुवारी २०२२ रोजी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली आहे.
राज्य सरकारने बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर आता जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र, या दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला.
सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले. त्याच दरम्यान अन्य एक बैलगाडीचे बैल उधळले व सैरवैर पळू लागले, त्यामुळे बैल गाडी मालक जखमी झाला. याचसोबत अन्य दोन जण देखील जखमी झाले आहेत.
हे ही वाचा:-