मुंबई : नाशिकमधील झाकीर हुसेन या रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे, या घटनेत समोर आलेल्या माहितीनुसार २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तसेच अजूनही आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत पावलेल्या रुग्णांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत पडलेल्या रुग्णांना राज्य सरकारकडून पाच लाख मदत जाहीर केली आहे.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.