मुंबई । भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी ‘INS करंज’ दाखल झाली. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलाने उचलले हे महत्वाचे पाऊल आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत समारंभपूर्वक ‘INS करंज’ चे जलावतारण झाले. या पाणबुडीमुळे भारतीय नौसेनेची ताकत शतपटीने वाढणार असून ‘INS करंज’ ही शत्रुसाठी सायलंट किलर ठरणार आहे.
शत्रुला कुठलाही मागमूसही लागू न देता, त्यांच्या प्रदेशात पोहोचून विध्वंस घडवण्याची क्षमता ‘INS करंज’ मध्ये आहे.
१५६५ टन वजनाची ‘INS करंज’ ७० मीटर लांब, १२ मीटर उंच आहे. क्षेपणास्त्र आणि टॉरपीडोजने सज्ज असलेली ही पाणबुडी समुद्रात सुरुंग पेरण्याची क्षमता ही आहे.
समुद्रात रडारला चकवून हल्ला करणे हे ‘INS करंज’चे सर्वात मोठे वैशिष्टय आहे. यापूर्वी स्कॉर्पिअन वर्गातील दोन पाणबुडया ‘INS कलवरी’ आणि ‘INS खंडेरी’ नौसेनेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
आता चौथी पाणबुडी वेलाच्या समुद्री चाचण्या सुरु आहेत. पाचवी पाणबुडी वागिरही लाँच झाली आहे.
चीन आणि पाकिस्तानला धोका
‘INS करंज’मुळे हिंदी महासागरातील भारताची ताकत वाढणार आहे. या समुद्री क्षेत्रात भारतासमोर चीन आणि पाकिस्तानचे आव्हान आहे.
चीन सतत आपल्या समुद्री शक्तीचा विस्तार करत आहे. ‘INS करंज’मुळे चीन आणि पाकिस्तानवर भारताला वचक ठेवता येईल.