मुंबई दि.६- काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून शुक्रवारी याच जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. मनसुख हिरेन असं मृत व्यक्तीचं नाव असून यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला असल्यालाचा धक्कादायक प्रकार समोर आला. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत.
याच प्रकरणाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे. “जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.