अंबरनाथ। अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तिघा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. टाकीत असलेल्या गॅसमुळे गुदमरुन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ पश्चिमेला आयटीआय जवळील कंपनीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कलरच्या कामासाठी बोलावून तिघा कामगारांना केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. नाका-तोंडाला बांधण्यासाठी विशेष मास्क दिले नव्हते, त्यांनी फक्त नाकाला कपडाच बांधला होता, असंही एका कामगाराने सांगितलं आहे. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कामगार सफाईसाठी उतरले. एकाची तब्येत बिघडल्यामुळे तो औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला. मात्र, याच वेळी तिघे कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती त्याला मिळाली.
दरम्यान या घटनेत हर्षद, बिंदेश आणि दिनेश या तीन कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व जण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा बळी गेल्याचं बोललं जात आहे. साई नावाच्या ठेकेदाराने आपल्याला काम दिल्याचं एका कामगाराने सांगितलं. तिघा मयत कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.