गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती . या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र देशमुखांनी आपल्या ट्विटवरून शेअर केले होते. हाच मुद्दा पकडत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करतं पुन्हा एकदा फडणवीसांना चिमटा काढला आहे.
राऊत म्हणाले की “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,” अशी टीका राऊत यांनी केली. ते दिल्लीत पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
“चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे.
म्हणूनच फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असे वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसते याचे भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.