परभणी – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झपाट्याने दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्ह्यातील आठवडे बाजार दि. १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी जारी केले आहेत.जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणार्या व विदर्भात जाणाऱ्या व्यक्ती व वाहनास अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास १५ एप्रिलपर्यंत मनाई केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी नव्याने जारी केले आहेत.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणार्या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्या कोणात्याही व्यक्तीस व वाहनास अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगर पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी, नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर राहील, असे आदेशात देखील म्हटले आहे.